मुंबई –
येत्या २७ जुलैला साजर्या होणार्या नागपंचमीला जिवंत नागांची पूजा करणे आणि त्याचे प्रदर्शन यांवर मुंबई उच्च न्यायालयाने यंदाही बंदी कायम ठेवली आहे. प्रतिवर्षी नागपंचमीला सहस्रो जिवंत साप पकडले जाऊन त्यांना क्रूरतेने हाताळले जात असल्यामुळे ३ वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने जिवंत नागांच्या पूजेवर बंदी आणली होती.
सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा गाव हे नागपंचमीला होणार्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे; मात्र नागपंचमीच्या निमित्ताने नागांची शिकार होऊन ती प्रथा तात्काळ बंद करून नागरिकांमध्ये त्याविषयी जनजागृती करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य शासनाला त्या वेळी दिलेले होते. त्या आदेशानंतर वनविभागाने ही प्रथा बंद पाडली. त्या आदेशांचा पुनर्विचार करण्याकरता सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जोशी यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर २१ जुलै या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने स्वतःच्या आदेशात कोणताही पालट करण्यास नकार देत याचिका निकाली काढली.